कंठाने गाणे म्हणावे. हातांनी अर्थ सांगावा, डोळ्यांद्वारे भाव व्यक्त करुन, पावलांनी ताल धरुन नृत्य प्रदर्शित करावे. तसेच ज्या दिशेला हात आहेत त्या दिशेला दृष्टी स्थिर करावी, ज्या दिशेला दृष्टी आहे तेथे भाव असावेत, आणि मग ज्या ठिकाणी भाव आहेत त्या ठिकाणी रसाची उत्पत्ती होते आणि हीच कुचीपुडी नृत्यकलेची परंपरा आहे. कुचीपुडी नृत्यशैली म्हणजे गुरुशिष्य परंपरा ! कुचीपुडी नृत्य अंगीकारण्यासाठी गुरूवर श्रद्धा आणि निरंतर बारा वर्षे साधना या दोन गोष्टींची अत्यंत गरज असते. या पार्श्वभूमीवर स्वतः आंध्र भगिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'नाट्य सुंदर कला प्रवीण' या किताबाच्या मानकरी, आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टणम् गावी जन्मलेल्या गुरू विजयाप्रसाद आणि कुचीपुडी नृत्य शैली म्हणजे जणू अद्वैतच !
मछलीपट्टणमच्या माधवस्वामी कल्याण महोत्सवात सात दिवस व सात रात्री चालणारा कुचीपुडी नृत्यमहोत्सव पाहून अवघ्या तीन वर्षांच्या असतानाच त्या विलक्षण भारावून गेल्या. हा सुंदर नृत्यप्रकार आपण आत्मसात करायचाच असा मनाशी निश्चय झाल्यावर आई रुक्मिणीम्मा आणि वडील कृष्णाराव यांच्या प्रोत्साहनाने छोट्या विजयाने वयाच्या तिसऱ्या वर्षीच ब्रह्मश्री श्री वेदांतम् लक्ष्मी नारायण शास्त्री यांच्याकडे नृत्य शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि अतिशय खडतर कलातपश्चर्येला सुरुवात झाली. शालेय शिक्षण चालू होतेच. १९६१ ला विजयाताई मॅट्रिक झाल्या. 'कुचीपुडीच्या अभ्यासात त्यांनी ५२ हस्तमुद्रा आत्मसात केल्या. नवरसांचा काळजीपूर्वक अभ्यास करुन शृंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत व शांत या नवरसांतील भावरेखा त्या आविष्कारीत करू लागल्या.
कुचीपुडीतील पुष्पाजली, दशावताराम्, शब्दम्, कस्तुरी पद्य, तिल्लाना, जावळी, शिवतांडवम्, तरंगम्, स्वरपती, कृष्णशब्दम्, अन्नमाचार्य, कीर्तनास, त्यागराज कीर्तनास्, मंडूकपदम्, इ. प्रकार त्या मनापासून शिकल्या. १९४७ ते १९६७ अशी तब्बल २० वर्षे त्यांनी नृत्यसाधना केली. आठव्या वर्षापासूनच त्या जाहीर कार्यक्रम करु लागल्या. १९६५ ला त्या बी.ए. झाल्या. १९६८ ला त्यांचा विवाह रामकृष्ण प्रसाद यांच्याबरोबर झाला. पण लग्नापूर्वी त्यांचे ५०० च्या वर नृत्याचे जाहीर कार्यक्रम झाले होते. आंध्रप्रदेशच्या जवळजवळ सर्वच मान्यवरांनी त्यांचे कार्यक्रम पाहिले आहेत. आंध्र सरकारने त्यांना 'नाट्य सुंदर कला प्रवीण' हा अतिशय प्रतिष्ठेचा किताब दिला. लग्न झाल्यावर १९६८ मध्ये त्या मुंबईत आल्या. १९६८ ते १९७३ पाच वर्षे त्यांनी गुरूशिष्य परंपरेनुसार शिष्या तयार करण्यास सुरुवात केली. कुचीपुडी नृत्यशैलीचा प्रचार व प्रसार हेच ध्येय विजयाप्रसादांचे होते. या उत्कट कलासक्तीचा त्यांनी ध्यासच घेतला होता आणि १९७४ ला त्या डोंबिवलीत स्थायिक झाल्या व इथेच त्यांच्या आयुष्याने सुरेख वळण घेतले !
याचवेळी ७ वीच्या बालभारतीच्या इंग्रजी पुस्तकातील एक धडा त्यांच्या वाचनात आला. त्यात असे लिहिले होते की कुचीपुडी ही नृत्यकला तंजावरची आहे' हे वाचून २० वर्षे कुचीपुडी नृत्यसाधना केलेल्या विजयाप्रसाद यांना खंत वाटली. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या लक्षात ही चूक आणून दिली आणि मग चुकीची दुरुस्ती करण्यात आली की, 'कुचीपुडी ही नृत्यकला आंध्र प्रदेशची आहे.' आणि म्हणूनच विजयाप्रसाद यांच्या लक्षात असे आले की, महाराष्ट्रात या नृत्यशैलीची माहिती नाही. ध्येयाने प्रेरीत झालेल्या विजयाप्रसाद यांनी १९८१ ला डोंबिवलीत 'कुचीपुडी डान्स् ॲकॅडमी' या शास्त्रीय नृत्य संस्थेची स्थापना केली. 'कुचीपुडी' या . आंध्रच्या नृत्यशैलीचे शिक्षण देणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच नृत्यसंस्था आहे. आणि मग विजयाप्रसाद झपाट्याने कामाला लागल्या. त्यांनी कुचीपुडी शैलीवरील पहिले मराठी व इंग्रजी पुस्तक 'कुचीपुडी नाट्यसंग्रह' प्रसिद्ध केले. या शैलीविषयी अनेक लेख लिहिले, कुचीपुडी नृत्य कार्यशाळा घेतल्या आणि त्यांच्या शिष्यांची संख्या वाढत चालली. सूर्यनमस्कार, श्लोक, ॐकार ध्यान, व गायत्री मंत्र या नियमित कार्यक्रमानंतरच त्या शिष्यांना कुचीपुडी नृत्य शिकवायला सुरुवात करतात. मन व शरीर शूर्चिभूत होऊन 'कुचीपुडी नृत्य साधना करणे' हा त्यामागचा संस्कार व उद्देश आहे. त्यांच्या कडक शिस्तीत व उत्तम मार्गदर्शनाखाली तयार होणारा त्यांचा शिष्यवृंद निरनिराळ्या शाळेत, महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये यशस्वीपणे कामगिरी करू लागला. यूथ फेस्टिवल, मूड इंडिगो यासारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये त्यांच्या शिष्यांनी अनेक बक्षिसे मिळविली. हैद्राबाद येथे संगीत नाटक अॅकॅडमीने आयोजित केलेल्या कुचीपुडी • महोत्सवात त्यांच्या मराठी शिष्यांनी आंध्रवासियांना चकीत केले. नेहरु सेंटरने मुंबईत आयोजित केलेल्या 'कल की खोज' या युवा नृत्य महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातून भाग घेतलेल्या भारतातील सर्व नृत्यप्रकारातील त्यांच्या शिष्येने सादर केलेले 'कुचीपुडीनृत्य' अतिशय प्रशंसनीय ठरले. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, अशा विविध राज्यातून त्यांच्या संस्थेने १५० हून अधिक कार्यक्रम केलेले आहेत. तेलगू युनिर्व्हसिटी ऑफ हैद्राबाद येथे जाऊन त्यांच्या शिष्यांनी कुचीपुडीच्या परीक्षा दिलेल्या आहेत. त्यांच्या विद्यार्थीनींना या अभ्यासासाठी केंद्र सरकारच्या शिष्यवृत्त्या मिळालेल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजयाप्रसाद यांची प्रयोगशीलता ! महाराष्ट्रभूमी विषयी आपला आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या संत वाङ्मयाला व जावळी • या रचनेला, कुचीपुडी शैलीतून नृत्यरुपात सादर करण्याचा अतिशय अभिनव प्रयोग केलेला आहे. यातूनच 'अभंग नृत्यखळी' हा विषय महाराष्ट्रीयन संताच्या अभंगावर आधारलेला दोन तासाचा कार्यक्रम त्या करतात. महाराष्ट्राच्या इतिहासातील १२ ते ३० १७ व्या शतकापर्यंतचा काळ हा भक्तीयुगातील सुवर्णकाळ म्हटला जातो. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, रामदास, मुक्ताबाई, चोखोबा, या संत श्रेष्ठांनी आपल्या वाङ्मयांने, अलौकिक कार्याने, चारित्र्याने, महाराष्ट्रास पावन केले. वर्षे डोंबिवलीत वास्तव्य करणाऱ्या विजयाप्रसादांनी महाराष्ट्रीय संस्कृतीची, कलेची व संत वाङ्मयाची अभ्यासपूर्ण ओळख करून घेतली. त्यासाठी मुकुंद देशपांडे यांची मदत घेतली. 'महाराष्ट्र भूमी पावन वीरांची खाण' या पोवाड्यातील कुचीपुडी शैलीतील नृत्यातून शाहीरांची सहजता, महाराष्ट्रभूमीविषयी प्रेम, शिवाजी राजाचे कर्तृत्व त्यांच्या शिष्य सादर करून महाराष्ट्राच्या वीरश्रीला वंदन करतात. 'ॐ नमोजी आद्या, वेदप्रतिपाद्या', या ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगावर कुचीपुडी शैलीतून विलोभनीय भक्तिरसाचा आविष्कार त्या घडवितात. ज्ञानेश्वरांच्या लावण्यमय शब्दांची पूजाच त्या मांडतात. 'ॐ कार स्वरुपा, सद्गुरु समर्था' या अवीट अमृतमय गोडीच्या अभंगावरचे कुचीपुडी नृत्य पाहून त्यांच्या कल्पकतेला प्रेक्षक मनापासून दाद देतात. लाल रेशमी गालिच्यावर, चांदण्याची रेशीम शाल पांघरून झोपलेला बाळकृष्ण, त्याला गोंजारीत असलेली यशोदा, गोपींचा कलकलाट या पार्श्वभूमीवर 'होनाजी बाळांची अमर भूपाळी 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' रुणझुणत्या पावलांनी झंकारते व बाळकृष्णाला जाग येते. कृष्णाचे विलोभनीय हावभाव, • गोपींचा लाडीक रुसवा, यशोदेचे वात्सल्य, हे सारे कुचीपुडीतून समर्थपणे त्यांनी मांडले आहे. त्यांच्या शिष्या नृत्यझंकारातून भूपाळी खरोखरीच अमर करतात. 'पाहूनिया सीतेला वायुसूत वंदन करी तिजला' रामदासांच्या अभंगातून रामभक्तीचे उत्कट दर्शन त्यांनी साधले आहे. 'देवा तुझ्यासाठी दिली खीर वाटी', नामदेवांच्या या अभंगातून बालसुलभ लडिवाळ भक्तिचे दर्शन त्या घडवितात. संत तुकारामांचा 'कन्या सासुरासि जाये' या अभंगातून तुकारामाच्या केशवाच्या भेटीची उत्कटता त्या सादर करतात. 'इमारत फळा आली आणि संतकृपा झाली' सर्व संताना एकत्रित काव्यात गुंफून संतश्रेष्ठांना व महाराष्ट्रभूमीला विनम्र भावपुष्पांजली त्या अर्पण करतात. संत वाङ्मयाला दृश्य स्वरुपात, नृत्यझंकारातून साकार करुन, विजयाप्रसाद यांनी महाराष्ट्रधर्म जागविला आहे.
कुचीपुडी शैलीतील 'जावळी' सारखी पारंपरिक नृत्ये, जी या शैलीतील अनेक दिग्गजांनी आपल्या अभिनय कौशल्याने अजरामर केली आहेत ती मराठी भाषेत भाषांतरीत करुन, धर्मपुरी जावळी या पारंपरिक तेलगू गीताचे, पारंपरिक राग, तालात, रुपांतर करुन मराठीतून जावळीचा आविष्कार म्हणजे विजयाप्रसाद यांच्या अभिनव कल्पकतेची यशोगाथाच आहे!' जावळी या नृत्यप्रकारात अष्टविध नायिका अवस्थांपैकी एका नायिकावस्थेचा स्थायीभाव असतो. सुप्रसिद्ध जावळी 'वाणी पोंदू चालू वदने' या शब्दरचनेचे "सांग सखे सांग त्याला, नको दुःखद प्रेमपात्र' असे मराठीत रुपांतर करून कानडा रागातील या गीतरचनेवरील 'खंडिता' साकार करण्यासाठी विजयाप्रसाद यांनी खूप कष्ट घेतले आहेत. श्रीकृष्णाच्या प्रेमाचा अत्यंत अहंकार असलेली सत्यभामा “भामने सत्य भामने" या रुपात त्यांची शिष्या जेव्हा साकार करते त्यावेळी विजयाप्रसादांच्या सृजनशीलतेचा प्रत्यय रसिकांना सुखावून जातो. असूर शक्तीचा विनाश करण्यासाठी स्त्री शक्तीने विविध रूपे घेतली व चराचराचे रक्षण केले त्या नवदुर्गेचे रूप नवदुर्गानृत्य नाटिकेतून ज्यावेळी त्यांच्या नऊ शिष्या सादर करतात त्यावेळी भलेभले मान्यवर अचंबित होतात. कोणत्याही कलेला भाषेचे, देशाचे, बंधन नसते. कलेची स्वतःची अशी एक वेगळीच परिभाषा असते. हे जरी खरे असले तरी स्वभाषेतून अधिक सजगतेने व परिपूर्णपणे आस्वाद घेता यावा म्हणूनच कुचीपुडी शैलीतील पारंपरिक शास्त्रीय नृत्यप्रकार महाराष्ट्रातील लोकांपर्यंत चांगल्या रितीने पोचविण्यासाठी धर्मपुरी जावळीचे मराठीत भाषांतर करुन जावळी हा देखणा नृत्यप्रकार विजयाप्रसाद साकार करतात.
'शिवपल्लकी सेवा प्रबंधमख' ही शहाजी महाराज यांची अलौकिक तेलगू शब्दरचना आहे. ही शब्द रचना मराठीतून नृत्य नाटिकेच्या रुपात त्यांनी अलीकडेच साकार केलेली आहे. पार्वती, भगवान शिवाला आणण्यास पालखी पाठविते. हिरे, रत्नजडीत अशा अतिशय सुंदर पालखीत शंकर बसतात अशा आशयाच्या नृत्यात मुख्यतः पालखीच्या सुंदर सजावटीचे वर्णन पदन्यासातून ज्यावेळी साकार होते त्यावेळी साक्षात देवगंधर्व अवतीर्ण झाल्याचा भास विजयाप्रसाद निर्माण करतात. अफाट कल्पनाशक्ती म्हणजे विजयाप्रसाद !
नदीचा प्रवाह कधी शांतपणे वाहतो, तर कधी तो उग्र रुप धारण करतो, तर कधी त्याची गती वाढते. याच 'लयगतीला' अनुसरून आपल्या मनातही स्पंदने निर्माण होतात. लय, स्पंदनाची अनुभूती जगत्मान्य आहे. निसर्गात प्रत्येक ठिकाणी दिसणाऱ्या ह्या लयीचे गूढ म्हणजे एक निसर्गनिर्मित कोडे ! आणि म्हणूनच सृष्टी प्रपंचाचा प्रवाह निरंतर चालू ठेवणारी 'लय' ही मध्यवर्ती कल्पना प्रमाणभूत मानून विजयाप्रसाद यांनी सुरेख मेळ साधला आहे ! आणि हे सारे त्या मराठीतून सादर करतात. 'झुळझुळ निर्झर चाळ, बांधूनी लय मात्रांच्या अद्भुत दर्शनी' ओमकाराने निसर्ग भारूनी, शिव सृष्टीची सांगड साऱ्या विश्वावरी ! अशा या लयगीतातून सारा निसर्ग त्या उभा करतात. आणि आता मराठी संगीत नाटकांवर आधारित कुचीपुडी शैलीतील नृत्यरचना त्या बसवित आहेत !
विजयप्रसाद यांच्या नृत्यरचना, इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, चंद्राबाबू नायडू, मनोहर जोशी, उस्ताद झाकीर हुसेन इत्यादी मान्यवरांसहित आंध्र प्रदेशातील सर्व श्रेष्ठींनी पाहिल्या आहेत. या आंध्रभगिनीने मराठीत केलेल्या नृत्यरचना पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे. महाराष्ट्रात या कुचीपुडी शैलीची सरकारमान्य अभ्यासपद्धती सुरू व्हावी व परीक्षा केंद्र मिळावे यासाठी विजयाप्रसाद प्रयत्नशील आहेत. भारत सरकारकडून या कलेला सहकार्य मिळून ती परदेशात पोहचवावी त्यासाठी त्या अथक परिश्रम घेत आहेत. सह्याद्री वाहिनीवर 'नृत्यांगना' या मालिकेत सहा भाग कुचीपुडीवर दाखविण्यात विजयाप्रसाद यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी आतापर्यंत गुरुशिष्य परंपरेप्रमाणे (१२ वर्षे कालावधी) २०/२२ शिष्या तयार केलेल्या आहेत. त्यांची एकेक शिष्या म्हणजे स्वतंत्र कुचीपुडी संस्थाच आहे.
विजयाप्रसाद, कलानिर्मितीत नेहमीच नवनवीन विषय हाताळून सृजनशील प्रयोग करतात. त्यांची प्रत्येक नृत्यरचना समाजाभिमुख, प्रेरणादायी, व मूल्यांचे वर्धन करणारी असते. कलेचा प्रांत आधिभौतिकापासून, आध्यात्मिक विश्वापर्यंत सर्व कक्षांना स्पर्श करणारा, व्यापक आणि व्यामिश्र असल्यामुळे त्याचं स्वरूप, साध्या, सरळ सोप्या भाषेत पकडून सुंदर नृत्याविष्कार सादर करणाऱ्या, कुचीपुडी शैलीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या, उत्कट कलासक्ती असणाऱ्या विजयाप्रसाद हे 'विश्वची माझे घर' या ज्ञानमंत्राच्या निस्सीम उपासक आहेत.